सायबर गुन्हे ही आज एक जागतिक आणि गंभीर समस्या बनत चालली आहे. हॅकर्स ऑनलाईन फसवणुकीच्या नवनवीन पद्धती शोधून काढत असून वेगवेगळे फंडे वापरून लोकांचे बँक अकाउंट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ओटीपी, ऑनलाईन पेमेन्ट, ईकॉमर्स यासारख्या माध्यमातून पैसे लुटत आहेत. कॉल करून बँक अधिकारी, पोलीस अधिकारी असल्याचे भासवले जाते.

डिजिटल अरेस्टसारख्या या जाळ्यात अनेकजण अडकले आहेत, अगदी कोट्यवधी रुपये गमावून बसले आहेत. मग प्रश्न पडतो इतके गुन्हे घडून हे हॅकर्स, चोरटे सापडत कसे नाहीत. खरेतर हे हॅकर्स हे तंत्रज्ञानाची माहिती असणारे असून नवनवीन तंत्राचा वापर करतात, त्याना एखादी व्यक्ती फसत नाही हे लक्षात आल्यावर ती दुसरा सावज शोधतात, त्यांना फक्त पैशाशी मतलब असतो. हे हॅकर्स सतत जागा बदलत असतात आणि वेगवेगळे प्रदेश वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीच्या युक्त्या वापरतात. त्यामुळे त्यांचा शोध घेणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान बनले आहे.
आयआयटी कानपूर-इन्क्युबेटेड स्टार्टअपने केलेल्या अभ्यासानुसार, राजस्थानमधील भरतपूर आणि उत्तर प्रदेशमधील मथुरा, झारखंडमधील जामतारा आणि हरियाणातील नूह ही सायबर फसवणुकीची ‘हॉटस्पॉट’ ठिकाणे बनली आहेत. अभ्यासात असेही आढळून आले आहे, की देशातील सर्व सायबर गुन्ह्यांपैकी ८० टक्के हे जिल्हे टॉप टेनमध्ये आहेत.
कोलकाता पोलिसांच्या निष्कर्षानुसार आयआयटी कानपूरमध्ये सुरू असलेल्या एका स्टार्ट-अपने गेल्या वर्षी तयार केलेले अहवाल भीषण वास्तव सांगणारे आहेत, ज्यामध्ये भरतपूर, मथुरा, नूह, देवघर, जामतारा, गुरुग्राम, अलवर, बोकारो, कर्मा तांड आणि गिरिडीह यासारख्या जिल्ह्यांचा सायबर गुन्ह्यांमध्ये ८० टक्के वाटा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या मोठ्या संख्येमुळे जामतारा (झारखंड) हा जिल्हा चर्चेत आला आहे, ज्यामध्ये फिशिंग फ्रॉडशी संबंधित अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. याशिवाय हरियाणातील नूह सारखा भाग प्रमुख सायबर गुन्ह्यांचे केंद्र म्हणून ओळखला जात आहे.

आता पाहुयात, कोणकोणत्या ठिकाणांहून फसवणुकीचे प्रकार केले जात आहेत, ते…
हे आहेत हॉटस्पॉट…
- भरतपूर (राजस्थान) : हे पूर्व राजस्थानमधील शहर असून उत्तर प्रदेश आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या सीमेजवळ आहे. भारतात होणाऱ्या सर्व सायबर गुन्ह्यांपैकी १८ टक्के गुन्ह्यांचे प्रमाण येथे आहे.
2. मथुरा (उत्तर प्रदेश) : पूर्व उत्तर प्रदेशातील हे शहर भगवान श्रीकृष्णाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. परंतु अलिकडच्या काळात वाढत्या सायबर गुन्ह्यांसाठी ते प्रसिद्ध होत आहे, एकूण सायबर गुन्ह्यांपैकी १२ टक्के प्रकरणे याच प्रदेशातून घडतात.
3. नूह (हरियाणा ) : उत्तर प्रदेशातील मथुरा आणि राजस्थानमधील भरतपूरसह, नूह हे शहर वाढत्या सायबर गुन्ह्यांसाठी कुप्रसिद्ध झाले आहे, कारण देशातील सर्व सायबर गुन्ह्यांच्या घटनांपैकी जवळपास ११ टक्के घटना येथे घडतात.
4. देवघर (झारखंड) : झारखंड राज्यातील एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र असलेल्या या शहरात सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये अचानक वाढ झाली आहे. देशात होणाऱ्या सर्व सायबर गुन्ह्यांपैकी १० टक्के गुन्ह्यांचा काही ना काही संबंध या देवघरशी आहे.
6. गुरुग्राम (हरियाणा) : दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात असलेले आयटी हब हे भारतातील सर्व सायबर गुन्ह्यांपैकी ८.१ टक्के गुन्ह्यांचे स्रोत आहे.
7. अलवर (राजस्थान) : राजस्थानमधील आणखी एक झोपाळू शहर आहे जिथे सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये सतत वाढ होत आहे. आकडेवारी दर्शवते की देशात होणाऱ्या सर्व सायबर गुन्ह्यांपैकी ५.१ टक्के गुन्ह्यांचा काही ना काही संबंध अलवरशी आहे.
8. बोकारो (झारखंड) : अधिकृतपणे बोकारो स्टील सिटी म्हणून ओळखले जाणारे, झारखंडमधील हे मोठे आणि नियोजित शहर सायबर गुन्हेगारांचे केंद्र बनले आहे. देशातील सर्व सायबर गुन्ह्यांपैकी २.४ टक्के गुन्ह्यांचे हे मूळ आहे.
9. कर्माटंड (झारखंड) : झारखंडमधील कर्माटंड हे गाव पहिल्या १० यादीत असेल की नाही याबद्दल शंका आहे, पण हे गाव. देशातील एकूण सायबर गुन्ह्यांपैकी २.४ टक्के गुन्ह्यांसाठी या गावातील तरुण जबाबदार असल्याचे म्हटले जाते.
10. गिरिडीह (झारखंड) : देशातील १० सायबर गुन्ह्यांच्या केंद्रांच्या यादीतील ५ शहरांपैकी गिरिडीह हे एक आहे. भारतात होणाऱ्या सर्व सायबर गुन्ह्यांपैकी जवळजवळ २.३ टक्के गुन्ह्यांचे मूळ गिरिडीहमध्ये आहे.

या ठिकाणीही वाढतेय फसवणुकीचे प्रमाण…
2022 मध्ये सायबर गुन्ह्यांची सर्वाधिक प्रकरणे ही तेलंगणामध्ये नोंदवली गेली आहेत. तर २०२३ मध्ये दिल्लीमध्ये सायबर गुन्ह्यांच्या सर्वाधिक तक्रारी नोंदवल्याचे काही अहवालांवरून स्पष्ट होते.
भारतातील सर्व राज्यांमध्ये हॅकिंग आणि फसवणूकीसारख्या गुन्हे घडतात, परंतु काही राज्यांमध्ये अशा गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि गुजरात या राज्यांमध्ये हॅकिंग आणि फसवणुकीची प्रकरणे जास्त आढळतात. विशेषतः मुंबई, पुणे, बंगळूर, हैदराबाद, दिल्ली अशा ठिकाणी गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहे, कारण तेथे तंत्रज्ञानाचा वापर आणि डिजिटल व्यवहार जास्त प्रमाणात होतो.
दिल्ली: राष्ट्रीय राजधानी म्हणून, दिल्लीमध्ये सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये त्याचा वाटा आहे, बहुतेकदा त्याची लोकसंख्या घनता आणि तंत्रज्ञान-जाणकार वातावरणामुळे.
मुंबई : ही देशाची आर्थिक केंद्र असल्याने, सायबर फसवणुकीच्या असंख्य प्रकरणांची नोंद झाली आहे.
पुणे : आयटी इंडस्ट्रीज असलेल्या पुण्यात ऑनलाईन फसवणुकीचे गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे.
कर्नाटक (बंगळुरू): भारताच्या सिलिकॉन व्हॅलीप्रमाणे, बेंगळुरूमध्ये हॅकिंग आणि फसवणुकीसह सायबर गुन्ह्यांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
उत्तर प्रदेश : नोएडा आणि गाझियाबाद सारखी शहरे, जी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) चा भाग आहेत, ती देखील सायबर गुन्ह्यांच्या क्रियाकलापांशी संबंधित आहेत.
राजस्थान : राजस्थानमधील काही भाग सायबर फसवणुकीसाठी हॉटस्पॉट म्हणून ओळखले गेले आहेत.
तेलंगणा (हैदराबाद): वाढत्या आयटी उद्योगासह हैदराबादमध्ये देखील सायबर फसवणुकीची प्रकरणे आढळली आहेत.
फसवणूक झाल्यानंतर काय कराल ?
सायबर गुन्ह्यांतर्गत फसवणूक झाली असल्यास सर्वप्रथम तुम्ही संबंधित बँकेशी अथवा क्रेडिट कार्ड कंपनीशी त्वरित संपर्क साधावा. तुमच्या अकाऊंटमधून पैसे काढले गेले असतील तर तीन दिवसांच्या आत तक्रार करावी. सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार दाखल करता येईल किंवा स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये जाऊन सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करावी.
फसवणुकीद्वारे गेलेलं पैसे परत मिळतात का ?
जर फसवणुकीद्वारे पैसे काढले गेले असल्यास ७ दिवसांनी तक्रार दाखल केली तर बँकेत फसवणुकीसाठी स्थापन केलेल्या कमिटीच्या बैठकीनंतर तसेच त्यांच्या निर्णयानंतरच ग्राहकांना पैसे परत केले जाऊ शकतात. पण हे लक्षात घेतले पाहिजे कि, फसवणुकीतुन काढली गेलेली रक्कम लाखोंची असो वा कोटींची असो किंवा इतर कोणतीही असो, बँकेची कमाल जबाबदारी १० हजार रुपयांपर्यंत असू शकते.
सायबर क्राईमच्या फसवणुकीसाठी कोणता कायदा आहे ?
सायबर फसवणुकीसाठी आयटी कायद्याच्या कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हे नोंदवले जातात, हा एक विशेष कायदा आहे. आयटी कायद्याच्या संबंधित कलमांमध्ये ‘कलम 66C ‘ चा समावेश आहे, ज्यामध्ये दुसऱ्या व्यक्तीची ओळख माहिती वापरून ओळख चोरी करणाऱ्यांना तीन वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा आहे, तसेच ‘कलम 66D’, ज्यामध्ये संगणक संसाधनांचा वापर करून बनावट ओळख निर्माण करून फसवणूक करणाऱ्यांना समान शिक्षेची तरतूद आहे.
ही काळजी घ्या :
– एसएमएस अथवा व्हाट्सअपवर आलेल्या कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करण्याचे टाळावे
– एखादी नामांकित कंपनी, संस्थेच्या अथवा शासनाच्या नावाने मेल, मेसेज आल्यास खात्री करावी.
– फोनवर कोणतेही अनोळखे ऍप डाउनलोड करण्याचे टाळावे